पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड गलिंच्छ शहर झाले आहे. मेट्रोचं काम निगडीपर्यंत नेता आले नाही. चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला हरताळ फासली गेलीय. कचऱ्याचा प्रश्न बिकट झालायं. स्मार्टसिटीच्या कामाला दिशा नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर झालायं, वायसीएम रूग्णालय दुर्लक्षित आहे. महापालिकेत भोंगळ कारभार सुरू आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐंरणीवर असून शहराला कोणी वालीच उरला नसल्याचे सांगत दिड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपाच्या ‘अपयशी’ कारभाराचा पाढाच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, जगदिश शेट्टी, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर आदी उपस्थित होते.
अजितदादा पवार म्हणाले, खोट्या घोषणा देऊन भाजपाने महापालिकेत सत्ता मिळवली, जनतेचे बहुमत देखील त्यांना मिळाले. दिड वर्षात या कारभाऱ्यांचा भोंगळ कारभारच दिसून आलायं.
गणेशोत्सव काळात पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. त्यावेळी शहर गलिंच्छ झाल्याच दिसले, कुठेही नियोजन असल्याचे दिसून आले नाही. मेट्रोला पुणे-पिंपरी असं नाव यांना देता आले नाही. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची राष्ट्रवादीची आग्रही मागणी होती. या सत्ताधाऱ्यांना मेट्रो निगडीपर्यंत नेता आली नाही. चऱ्होलीतील पंतप्रधान आवास योजनेला हरताळ फासला आहे. या कामाची सुरूवात भाजपकडून अद्याप झालेली नाही. दीड वर्षात शहरातील कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. पूर्वी राष्ट्रवादी सत्तेत असताना बेस्टसिटीचा पुरस्कार शहराला मिळवून दिला होता. भाजपाने स्मार्टसिटीचा प्रकल्प आणला परंतू तो संपूर्ण शहरासाठी नव्हे तर एका विशिष्ठ भागासाठीच मंजूर करून घेतलायं. जेएनएनयुआरएन योजनेअंतर्गत कामे करताना पूर्वी शरद पवार यांच्या मदतीने केंद्रातून निधी शहराला मिळत होता. म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलता आला. शहरातील पाण्याची परिस्थीती बिकट होत चालली आहे. २४x७ योजनेचे काम बंद पडले आहे. नागरिकांना एकावेळचे पाणीसुध्दा नीट मिळत नाही. नगरसेवकांची पाण्यासाठी भांडणे सुरू आहेत. स्मार्टसिटीची कामे भाजपच्या कारभाऱ्यांकडून नियोजनबध्द पध्दतीने होत नाहीत. भ्रष्टाचाराचा आखणी केलीय, त्याचे पुरावे आमच्या हातात आल्यावर नक्कीच जनतेपुढे सादर करणार आहोत. वायसीएम रूग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याची अवस्था आहे.रस्त्यांच्या कामांसाठी सल्लागारांची नेमणूक केली जात आहे. भूमिगत केबल टाकण्याच्या कामात आर्थिक तजजोडी केल्या जात आहेत. शिक्षण मंडळाच्या बैठकीला विषयपत्रिकाच तयार नसते. शहरात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐंरणीवर आहे. अत्याचाराच्या या घटनांनंतर पालकमंत्री किंवा स्थानिक नेत्यांनी कुठलचं वक्तव्य केलं नाही. यांची ही भूमिका शहरासाठी दुर्दैंवी आहे. यांच्याकडून नुसत्या पोकळ घोषणा सुरू असून सत्ताधारी भाजपाची ही मंडळी सपशेल अपयशी ठरली आहेत.