पिंपरी (Pclive7.com):- मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यात योग्य माणसांना भाजपा नक्कीच संधी देणार आहे. जिथे जातोय तिथे मंत्रीपदाबाबातच विचारलं जातयं, असे सांगत पिंपरी चिंचवडच्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? यावर स्पष्ट बोलणे मात्र टाळत रावसाहेब दानवे यांनी ‘चुप्पी’ साधली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मावळ आणि शिरूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चिंचवड येथील आहेर गार्डनमध्ये पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री दिलीप कांबळे, आमदार बाळा भेगडे, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत असलेली राष्ट्रवादीची सत्ता उलटून टाकून भाजपाचा झेंडा फडकविणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे गेल्या वर्षभरापासून मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. वारंवार या दोघांनाही मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याची केवळ चर्चाच रंगत आहे. राज्यात शेवटचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या एकातरी आमदाराला यात संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.
याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी स्पष्ट बोलणे टाळले. ते म्हणाले की, दिवाळीनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यात चांगले काम करणाऱ्यांना भाजपा नक्कीच संधी देणार आहे. जिथे जातोय तिथे मंत्रीपदाबाबातच विचारलं जातयं, असे सांगत पिंपरी चिंचवडच्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? यावर मात्र बोलणे टाळत रावसाहेब दानवे यांनी ‘चुप्पी’ साधली.