पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील वारस नोंदी करण्यासाठी भाडेपट्टाधारकांना होणा-या त्रासाकडे आमदार महेश लांडगे आगामी हिवाळी अधिवेशवात लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधणार आहेत. याबाबतची लक्षवेधी त्यांनी सादर केली आहे. तसेच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, आरोग्य, शालेय क्रीडांगणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कारभाराकडे तारांकित प्रश्नाद्वारे आमदार लांडगे सरकारचे लक्ष वेधणार आहेत.
राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या सोमवार (दि.१९)पासून मुंबईत सुरु होत आहे. या अधिवेशनात भोसरीचे आमदार महेश लांडगे विविध संसदीय आयुधांचा वापर करुन शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणार आहेत. याबाबतच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न त्यांनी सादर केले आहेत.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील भाडेपट्टाधारकीतल सुमारे एक लाखाहून अधिक मिळकतीच्या वारस नोंदी या प्राधिकरणाच्या भूवाटप नियमावली नुसार करण्यात येतात. प्राधिकरण क्षेत्रामधील मूळ भाडेपट्टाधारक याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाच्या नावे मिळकत होण्यासाठी प्राधिकरणाकडून न्यायालयाकडील वारसा दाखल्याची किंवा सिटी सर्व्हेच्या मंजूर नोंद प्रतीची मागणी केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे वारस नोंदीची प्रक्रिया सक्षम अधिकारी किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे मृत्यू दाखला सादर करुन व जाबजबाब घेऊन महसुली प्रक्रीयेप्रमाणे करावी, अशी मागणी प्राधिकरणातील भाडेपट्टाधारक, लोकप्रतिनिधींनी वारंवार केली आहे. पंरतु, यावर कोणतेही कारवाई केली नाही, याबाबत आमदार महेश लांडगे यांनी लक्षवेधी सादर केली आहे.
त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० भरलेले असतानाही शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे खरे आहे का?. असे असल्यास पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेची कारणे काय आहेत. अनियमित पाणीपुरवठ्यास जबाबदार असणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर आयुक्तांनी कोणती कारवाई केली. कारवाई करण्यास विलंब का झाला?. महापालिकेच्या १०५ शाळांपैकी ३० शाळांमध्ये क्रीडांगणाचा अभाव आहे का? असल्यास क्रीडांगण उपलब्ध करुन देण्याबाबत कोणती कारवाई सुरु आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहामाही परीक्षेत इंजिनिअरिंग शाखेतील दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले आहेत की नाही. गुण दिले नसल्यास पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत झालेल्या हलगर्जीपणास जबाबदार असणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर विद्यापीठाकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे. राज्यात स्वाईन फ्ल्यूने डोकेवर काढले आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत. याबाबत आमदार लांडगे यांनी तारांकित प्रश्न सादर केले आहेत.






















Join Our Whatsapp Group