पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर त्याचा होणारा परिणाम.. काय बदल होणार..? सत्तांतर होणार का…? याचा थोडक्यात लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलायं आमच्या नजरेतून…
भाजपाच्या पराभवाची कारणे…
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला, तर तीन राज्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळविला. दिल्ली, पंजाब वगळता सर्वत्र विजयाची पताका फडकवणारी भाजप या पाच राज्यात का मागे का पडली? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एकाधिकारशाहीपणा, भाजपातील अंतर्गत नेत्यांसह जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतीय जनतेला रुचला नाही. नोटाबंदी, GST, बुलेट ट्रेन, स्टॅच्यु ऑफ युनिटी, राफेल एअर क्राफ्ट विमान गैरव्यवहार प्रकरणी योग्य खुलासा वेळीच केला गेला नाही. राममंदिराचा मुद्दा लोकांना पटला नाही. निवडणुकीत मतदारांना गृहीत धरले गेले. राहुल गांधी व विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टिका केली गेली. ‘मन की बात’ची अनावश्यक लांबलेली मालिका देशातील जनतेला रुचली नाही. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांना अपमानास्पद वागणुक दिली गेली असा संदेश भाजप कार्यकर्त्यांमध्ये गेला. शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक समाजातील अनेक घटकांना आश्वासने नको तर कृती हवी होती. नुसत्या आश्वासनांमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.
काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणारा अमित शहांचा चेहरा लोकांना नकोसा वाटला.. व्यक्ती स्त्रोत जनतेने नाकारले. कित्येक ठिकाणी अगदीच थोड्या मतांनी भाजपाचा पराभव झाला. नरेंद्र मोदी सोडले तर देशपातळीवर भाजपाकडे एकही आश्वासक चेहरा नाही आणि भाजपा केवळ मोदींवर विसंबुन राहीली. R.S.S. चा प्रभाव व प्रचार कमी पडला. सर्व धर्मनिरपेक्ष विचारांची मते काँग्रेसकडे वळाली. राहुल गांधी व त्यांच्या टिमने वातावरण खराब असताना देखील खेळपट्टीवर टिकुन राहण्याचा चंग बांधला व त्यातच त्यांनी शतकी खेळी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा परिणाम…
महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता इतर मंत्री आपला आपला प्रभाव पाडताना दिसत नाही. प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनाच सर्व बाबी हाताळाव्यात लागतात.
ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर मतांची रस्सीखेच (जुगलबंदी) होणार.
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्या निर्णयाचा भाजपला योग्य फायदा घेता आला नाही.
महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखे बहु आयामी नेतृत्व भाजपाविरोधात इतर पक्षांची मोट बांधू शकतात.
महाराष्ट्रात ग्रामीण भाग हा भाजपाविरोधी तर शहरी भाग भाजपा बरोबर असे दृश्य दिसते.
केलेली विकास कामे जनतेपर्यंत योग्य पध्दतीने पोहचविण्यास भाजपाचे कार्यकर्ते कुठे तरी कमी पडताना दिसत आहे.
सर्व सामान्य जनतेची आणि सरकारची नाळ जुळताना दिसत नाही.
शिवसेना आणि भाजपाचा कलगी तुरा सध्याच्या वातावरणात विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.
सोशल मिडीयासह विरोधक देखील सर्वच स्तरावर आक्रमक झाले आहेत.
थोडक्यात सध्या झालेल्या निवडणुक निकालानंतर योग्य वेळी भाजपाने अचुक पाऊले टाकली नाहीत. जनतेची नाडी ओळखली नाही तर प्रतिकुल परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही.
सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे असे जनतेच्या मनातील सुप्त इच्छा दिसते.
या निकालाचा पिंपरी चिंचवडवर होणारा परिणाम…
भाजपाच्या या पराभवाचा सध्यातरी पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर लगेच काही परिणाम होणार नाही. महापालिका निवडणुका २०२२ साली आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील तुल्यबळ उमेदवार हे पिंपरी चिंचवड मधील आहेत, त्यामुळे ह्या निकालानंतर कशा व काय भुमिका घ्यायच्या हे लगेचच कोणी जाहिरपणे सांगणार नाही.
श्रीरंग बारणे, लक्ष्मण जगताप, संजोग वाघेरे पाटील हे आता अधिक आक्रमकपणे सावधरित्या पाऊले टाकण्यास सुरुवात करतील.
कागडी आकडेमोड न करता जो योग्य नियोजनाने जनतेपुढे पक्षाची व स्वत:ची भुमिका मांडण्यात यशस्वी ठरेल त्यालाच वातावरण पोषक राहील.
थोडक्यात सध्या येऊ घातलेली निवडणुक ही देशपातळीवरची असल्याने पक्षजी भुमिका घेईल तिच भुमिका पिंपरी चिंचवड मधील नेत्यांना मान्य करावी लागेल ह्यात तिळमात्र शंका नाही.