पिंपरी (Pclive7.com):- मागासवर्गीय कुटुंबातीतील एका सदस्याच्या बँक खात्यावर सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा तेलंगणा सरकारनं केली आहे. पहिल्या टप्प्यात 11 हजार 900 जणांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तेलंगणात विधानसभेचे मतदारसंघ 119 आहेत. प्रत्येक मतदारसंघातील 100 कुटुंबाचा जनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश आहे. या प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीच्या थेट बँक खात्यात 10 लाख रुपये जमा करण्यात येतील, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
अशी आहे योजना
या योजनेचं नाव आहे ‘मुख्यमंत्री दलित अधिकारिता कार्यक्रम’. राज्यातील मागासवर्गीय आर्थिक स्थिती मजबूत करून त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
या योजनेमुळं मागासवर्गीय कुटुंबांना आत्मविश्वास मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतील, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत या योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या योजनेसाठी सध्या 1200 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मागासवर्गीयांबाबतचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं
समाजात अजूनही जातीभेदाचं वातावरण असून दलितांकडं पाहण्याचा दृष्टीकोन सुधारलेला नसल्याची खंत मुख्यमंत्री राव यांनी व्यक्त केली. सर्वपक्षीय बैठकीत याच मुद्द्यावर जोर देण्यात आल्याचं सांगत समाजातील सर्व घटकांपर्यंत हा संदेश जाण्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आल्याचं राव यांनी म्हटलं आहे. हा निर्णय केवळ आपला नसून सर्व पक्षातील सर्व घटकांचा या निर्णयात सहभाग असल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला.
तेलंगणा ठरणार रोल मॉडेल
देशातील अनेक राज्यांमध्ये आजही मागासवर्गयांनबाबत भेदभाव केला जातो. अनेक सामाजिक कारणांसोबत आर्थिक कारणंही त्यामागे आहेत. सामाजिक कारणं बदलायला वेळ लागू शकतो. मात्र आर्थिकदृष्ट्या दलितांना सबळ करण्यासाठी सरकार कशी पावलं उचलू शकतं, याचं रोल मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न म्हणून तेलंगणातील या प्रयोगाकडं पाहिलं जावं, अशी अपेक्षा सत्ताधारी व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी सांगितले की तेलंगणा राज्याच्या धर्तीवर ठाकरे सरकारने सुद्धा ही योजना अंमलात आणावी व राज्यातील राज्यातील गरीब मागासवर्गीय जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देण्याचे काम करावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली. ते म्हणाले की गरीब जनतेचे हाल महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, सध्या राज्यामध्ये बेरोजगारीचे मोठे प्रमाण आहे,या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार एक चांगला निर्णय घेईल येईल अशी अपेक्षा घेऊन त्यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.