५५ मध्ये मुख्यमंत्री झाला.. तर ५० मध्ये महापौर का नाही?भाजपाचे आमदार महापालिकेतील ठेकेदारीत गुंतलेत..!
पिंपरी (Pclive7.com):- पाच वर्षापूर्वी भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्तची घोषणा करत भाजपाने महापालिकेत सत्ता मिळवली. परंतू त्यांचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी महापालिकेतील ठेकेदारी गुंतले आहेत. असला आमचा धंदा नाही, म्हणून गेली ४० वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे यावेळी खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्तचा मुद्दा घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. कार्यकर्त्यांनी देखील हेच ध्येय ठेवले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत पुढचा महापौर शिवसेनेचा होणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आज संवाद साधला. येणाऱ्या निवडणुकीत कसे सामोरे जायचे याची चर्चा कार्यकर्त्यांसोबत केली. सर्व पदाधिकारी आगामी निवडणुकीत महापौर हा शिवसेनेचाच होईल हेच ध्येय ठेवून कामाला लागले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही शिवसेनेचाच महापौर बसवू असा विश्वास आहे.
गेल्या पाच वर्षांपूर्वी भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्तच्या घोषणा देऊन भाजपा इथे सत्तेत आली. मात्र या सर्व गोष्टींचा अंत झाला नाही. आता आम्ही तोच मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. शहरात भाजपाची ताकद नसून की सूज आहे. महापालिकेत भाजपा सत्तेत आहे, मात्र अर्ध्याहून अधिक राष्ट्रवादी-सेनेचीच माणसे बेडूक उड्या मारून तिकडे गेली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत जनतेच्या पैशांची घाणेरड्या पद्धतीने लूट होत आहे. तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे मंत्रालयापर्यंत पोहोचली आहेत. मुंबईत बसलेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी यावर मत व्यक्त केले पाहिजे. दुस-यांवर जसे बोलतात. तसे यावर बोलणे देखील गरजेचे आहे. त्यांना स्वत:वरील टीका सहन होत नाही. सत्य सहन होत नाही. याला राजकारण म्हणत नाही.
५५ मध्ये मुख्यमंत्री झाला तर ५० मध्ये महापौर का नाही?
खासदार संजय राऊत म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात किमान ५० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र पन्नासमध्ये महापौर होत नाही असं पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले ५५ मध्ये मुख्यमंत्री झाला.. तर ५० मध्ये महापौर का होणार नाही. तसेच राज्यात महाविकास आघाडी आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी होणार की, नाही ते योग्य वेळी ठरवू.. राष्ट्रवादीकडून सन्मानजनक जागा वाटप झाले तर त्यांच्याशी त्यावेळी चर्चा करू असे खासदार राऊत म्हणाले.