राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यासमोर सत्ताधारी भाजपवर चढवला हल्ला
पिंपरी (Pclive7.com):- भाजपच्या कारभारात पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. लाच प्रकरणात त्यांच्या स्थायी समिती अध्यक्षांसह काही जणांना अटक झाली. परंतु, हा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांना दिसत नाही. त्यांनी त्यावर काही केले नाही. कोणाचा राजीनामा घेतला नाही. याचं उत्तर खरं तर त्यांच्याकडून शहराला अपेक्षित आहे, असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी कार्यकर्त्चा मेळाव्यात सत्ताधारी भाजपवर चढवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब यांचा दोन दिवसीय पिंपरी चिंचवड दौरा झाला. या दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत रहाटणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्यात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
ते पुढे म्हणाले की, मागील महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळे मतदारांनी पिंपरी-चिंचवड शहराची सत्ता त्यांना दिली. त्यावेळी शंभर दिवसांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्याचे काही होऊ शकले नाही. पूर्ण शास्तीकर माफी शहराला मिळाली नाही. कोणतेही प्रश्न तडीस नेता आले नाही.
उलट शहरात भ्रष्टाचार बोकाळला. लाच प्रकरणात स्थायी समितीचे अध्यक्ष आणि कर्मचा-यांना अटक झाली. पण, ही गोष्ट देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांना दिसत नाही. त्यांनी त्यावर काही केले नाही. कोणाचाही राजीनामा घेतला नाही. याचं उत्तर खरं तर त्यांच्याकडून शहराला अपेक्षित आहे. महागाईवरून युपीए सरकारवर टीका करणा-या भाजपला आता आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे. त्यांच्या सरकारच्या महागाईमुळे गरिबांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी, कामगारांच्या विरोधात काळे कायदे करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
साहेबांच्या दौ-यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिशा
पिंपरी चिंचवड शहरासाठी शरद पवार साहेबांनी दोन दिवस दिले. येऊ घातलेल्या आगामी निवडणुकीसाठी त्यांनी लक्ष दिले. सर्वांचे म्हणणे आणि मत ऐकून घेतले. न थांबता, न थकता जनसामान्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठीची धडपड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमांतून शरद पवार साहेब आणि अजितदादांनी कायम शहराकडे लक्ष दिले. पिंपरी चिंचवडला वेगळी ओळख मिळवून दिली. या दौ-यातून शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिशा मिळाली असून आगामी निवडणुकीसाठी सर्व जोमाने कामाला लागल्याचे संजोग वाघेरे पाटील यावेळी म्हणाले.