पिंपरी (Pclive7.com):- जागतिकीकरणाच्या युगात आता आपण जगाचे नागरिक झालो आहोत. मात्र आजही जगात एक विचार स्विकारण्यात आलेला नसल्याने पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्याची ताकद संतांच्या विचारसरणीत आहे. वैश्विक कुटुंबाची संकल्पना रुजवण्यासाठी आपल्याकडे संतांचा वारसा आणि विचार आहेत. त्याआधारे आपण जगाला एका विचारधारेत गुंफू शकतो, असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित टाळगाव चिखली येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे संचालक प्रा डॉ सदानंद मोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगांव चिखली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त “जगद्गुरू संत तुकाराम महाराज जीवन दर्शन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ.मोरे बोलत होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगांव चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक व आयुक्त तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमास संतपीठाचे संचालक राजु महाराज ढोरे, अभय टिळक, स्वाती मुळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी उपस्थित होते. परिसंवादामध्ये संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प.संतोष महाराज बढेकर, हभप अभय जगताप, हभप आप्पा बागल, अमृता कोल्हे, सचिन पवार यांनी सहभाग घेतला होता.
प्रारंभी गायत्री थोरबोले यांनी ‘तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम’ हा अभंग सादर केला. यानंतर नेहा नाफडे यांनी ‘पैल आले हरी’ हा अभंग सादर केला. बाल विद्यार्थिनी लावण्या विजय कमजाळे हिने इंग्रजी भाषेतून संत तुकाराम महाराज यांची महती सांगितली. ‘ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू’ हा अभंग सादर करून तिने रसिकांची वाहवा मिळवली.
संतपीठाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर गतीने वाटचाल सुरू आहे याबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासक राजेश पाटील म्हणाले, आधुनिक युगामध्ये संत परंपरेतील मूल्य समाजापर्यंत रुजवण्याची गरज आहे. या अमूल्य ठेव्याचा देशाबाहेर प्रचार प्रसार करण्यासाठी अभ्यासक तयार करणे गरजेचे असून ते संतपीठाच्या माध्यमातून निर्माण होतील. अध्यात्मावर काम करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्स्मरण संतपीठाच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये सर्वांचा आंतरिक सहभाग आणि पाठिंब्याचे बळ मिळेल अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. भारतामध्ये संतांविषयी संशोधन अथवा अभ्यास करण्यासाठी भविष्यात संतपीठ हे प्रभावी माध्यम ठरणार असून त्यादृष्टीने जडणघडण सुरू आहे. संतपीठातून संत विचारांचा प्रचार प्रसार करणारे सैनिक तयार होतील, असेही ते यावेळी म्हणाले.
संतपीठाची संकल्पना मूर्त स्वरूपात पाहत असताना अतिशय आनंद होत आहे, अशी भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मनापासून जबाबदारी स्वीकारून संतपीठाचे संचालक मंडळ काम करत आहे. संतपीठामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये अशी माझी आग्रही भूमिका राहिली आहे. संतपीठाचे काम वाढत आहे याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. संतपीठ हे भक्तीचे आणि अध्यात्माचे महत्वपूर्ण स्थान असून याद्वारे जगात संत विचारांचा प्रचार-प्रसार होणार आहे. त्यामुळे टाळगाव चिखलीचे नाव देखील जागतिक पातळीवर जाणार आहे. भोसरीतील कुस्ती संकुलामध्ये शक्तीची उपासना होते. या संकुलाच्या माध्यमातून शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी इच्छा असून त्यादृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केली.
ह भ प संतोष महाराज बढेकर म्हणाले, संत तुकोबारायांचे विचार आणि आचार लौकिकदृष्ट्या नव्हे तर त्यांचे कार्य अलौकिक होते. तुकोबारायांनी गाथेच्या माध्यमातून शब्दांची रत्ने समाजाला दिली. त्यांचे आचार विचार आणि नीती तत्वांचे जीवन प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. अभिमान सोडून सर्वसामान्य आयुष्य जगत असताना ते आनंदाने जगावे अशी शिकवण तुकाराम महाराज यांनी दिली.
प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, जुन्या काळातील महत्त्वाचे विचार आधुनिक काळातील भाषेत मांडण्याची आवश्यकता आहे. आजच्या जगण्याच्या प्रश्नांशी त्यांचा संबंध कसा पोहोचतो हे त्यातून मांडले पाहिजे. प्रत्येक पिढीला समजेल अशा पद्धतीने संत साहित्याची मांडणी गरजेची आहे. आधुनिक तत्वज्ञान जगापुढे मांडण्यासाठी अभ्यासकांची आवश्यकता आहे, हे अभ्यासक संतपीठाच्या माध्यमातून निर्माण होतील अशी अपेक्षा डाॅ. मोरे यांनी व्यक्त केली. ग्लोबल युगात आपण आता जगाचे नागरिक झालो आहोत. एक नागरिकत्व निर्माण झाले असले तरी एक विचार निर्माण झालेला नाही. जगात ही पोकळी निर्माण झाली असून संत विचार आणि परंपरा ती पोकळी निश्चितपणे भरून काढेल. त्यासाठी हे विचार जगापुढे मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. आज जग मिथ्या राहिले नसून ते अधिक वास्तववादी बनले आहे. वैश्विक कुटुंब संकल्पना रुजवण्यासाठी आपल्याकडे संतांचा वारसा आणि विचार आहे. प्रत्येक पिढीला समजेल अशा भाषेत आणि स्वरूपात संत विचारांची मांडणी करून त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन डॉ. मोरे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अभय टिळक यांनी केले. आभार डॉ.स्वाती मुळे यांनी मानले. ह भ प राजू महाराज ढोरे यांनी गायलेल्या ‘आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी’ या अभंगाच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.