(प्रतिनिधी):- राष्ट्रवादीने शहराचा सर्वांगिण विकास करून देखील महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडवासियांनी नाकारले. त्यानंतर या सहा महिन्यात भाजपला योग्य पध्दतीने कारभार करता आला नाही. शहरात एकही नवा प्रकल्प सुरू झाला नसून जुने प्रकल्प गुंडाळण्याचा उद्योग सत्ताधारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे थेट अजित पवार यांनी महापालिका गाठत आयुक्तांना जाब विचारला. हे शहर आमचे आहे, इथला विकास आम्ही थांबू देणार नाही असे सांगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.
महापालिकेतील स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, दत्ता साने, नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर तसेच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
महापालिकेत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आली. महापालिकेने सत्तेत असताना अनेक विकासकामांचे भूमीपूजन केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी आज महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. तब्बल दोन तास त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगरसेविका आणि अधिका-यांसोबत बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणालो की, महापालिका निवडणुकीत भाजपने भली मोठी आश्वासने दिली होती. खूप स्वप्न दाखविली होती. त्यामुळे जनतेने भाजपला एकहाती सत्ता दिली. मात्र, ती आश्वासाने पूर्ण करण्याच्या दिशेने सत्ताधा-यांची पाऊले पडताना दिसत नाहीत. शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, मारामा-या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या लहान मुलांचे अपहरण होत आहे. त्यातच शहरातील अनेक ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बंद आहेत. महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत दुरुस्त केले पाहिजेत.
पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत होणे गरजेचे आहे. नागपूरची मेट्रो सुरू झाली असून पिंपरीत मात्र खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. काम वेगात होण्यासाठी सत्ताधा-यांची राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. शहरातील बीआरटीएसचे प्रलंबित मार्ग लवकर सुरू केले पाहिजेत. शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. प्रशासनाने यावर लक्ष दिले पाहिजे. शास्तीकर माफीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रधानमंत्री आवाज योजनेचे काम गतीने करून वेळेत पूर्ण केले पाहिजे. शहराच्या विकास आराखड्याला २० वर्ष झाली आहेत. त्यामुळे नवीन विकास आराखडा करण्याची गरज आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, पिंपरी महापालिकेच्या वतीने निगडीत भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानालगत १०७ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या काळात झाले होते. या कामाची सद्यस्थिती तसेच पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, भोसरी, चिंचवड येथील रुग्णालयाच्या कामाची सद्यस्थिती, भामा-आसखेड, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, सामाविष्ट गावातील रस्ते, आरक्षणे, रस्त्यांचे रुंदीकरण, बीआरटीएस प्रकल्प, तळवडे येथील ‘डिअर’ पार्क, चिखलीतील प्रस्तावित संतपीठ, जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेली प्रलंबित कामे, शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, डेअरी फार्म येथील उड्डाणपूल, दिघीमार्गावरील संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर समूहशिल्प, बोपखेलला जोडणारा पूल अशा विविध कामांचा पवार यांनी आढावा घेतला.