पिंपरी (प्रतिनिधी):- आम्ही सत्तेत नसल्यासारखेच आहोत, मी माझ वैयक्तीक मत पक्षाच्या हाय कंमाडला सांगितलं आहे. सत्तेत असो किंवा नसो, फारसा फरक पडत नाही, कधीही सत्तेतून बाहेर पडावं. मी पक्षप्रमुखांना सांगितलं आहे की भाजपसोबत सत्तेत राहणे नुकसानाचेच आहे. शेवटी पक्षप्रमुख निर्णय घेतील असे मत शिरूरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत आज बैठक घेतली. या शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरप्रमुख व महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे, शहरसंघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार आढळराव पाटील बोलत होते.
बैलगाडा शर्यतीवरील बंदीबाबत बोलताना त्यांनी सरकारवर खापर फोडले. ते म्हणाले की, बैलगाडा शर्यतीवरील बंदी हे राज्य सरकारचं अपयश आहे. तामिळनाडूमध्ये बैलगाड्यांपेक्षा जास्त क्रुरता असलेली जलिकट्टू स्पर्धा सुरू आहे. आपल्याकडे मुख्यमंत्री बैलगाडीवर चढले, मिरवणूक काढली, फोटो काढले. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्सबाजी करून आभार मानले. काडीचं काम कुणीच काही केलं नाही. केवळ श्रेय लाटण्याची घाई केली.