पिंपरी (Pclive7.com):- मातंग साहित्य परिषदेच्या वतीने आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.२०) रोजी काळेवाडी येथे एकदिवसीय मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडीतील राजवाडेनगर येथे ‘राजवाडा लॉन्स’ येथे होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, समता साहित्य परिषदेचे मुख्य कार्यवाह प्रसन्न पाटील, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजक डॉ. धनंजय भिसे यांनी दिली.
या संमेलनात अभिनेते संदीप पाठक यांची साहित्यिक गणेश खंडाळे प्रकट मुलाखत घेणार आहेत. ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘गझल मुशायरा’ होणार असून डॉ. अंबादास सकट यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. प्रा. मुबीन तांबोळी यांचे ‘भारतीय कौटुंबिक संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रवींद्र जगदाळे यांनी संकलित केलेल्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन यानिमित्ताने भरवण्यात येणार आहे. या संमेलनात १६० कवींनी सहभाग घेतला आहे. साहित्य संमेलनाचा समारोप अभिनेते सुनील गोडबोले, निलेश गद्रे यांच्या उपस्थितीत होणार आहे.