पिंपरी (Pclive7.com):- खेळ म्हंटले की जय पराजय हा आलाच. मात्र खेळ कोणताही असो त्यात कुणाला पराजित करण्यासाठी नाही, तर स्व:ताला जिंकण्याकरिता खेळा असे प्रतिपादन महान कब्बड्डीपटु पहिल्या महिला अर्जुन पारितोषिक विजेत्या व जेष्ठ कब्बड्डीपटु शंकूतला खटावकर यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड़ व इखलास सय्यद मित्र परिवार यांचे वतीने आकुर्डी दत्तवाड़ी प्रभागातील विविध क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ते शहर पातळीवरील खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शिवाजी उदय मंडळ चिंचवडचे अध्यक्ष सदाशिव गोडसे, प्रमोद देशपांडे, झाकिर रमजान शेख, ज्ञानेश्वर ननावरे, अण्णा भोसले, रमेश बनसोड, यशवंत भालेराव, दत्ता बोर्हाड़े, शाहरुख शेख आदी उपस्थित होते.
यावेळी खटावकर पुढे म्हणाल्या की, भारतीय आहार, कसून सराव यांना प्राधान्य देत शीत पेय व मोबाईल या पासून युवकांनी दूर रहावे. तसेच युवकांनी मोबाईल पेक्षा मैदानाला वेळ द्यावा. ध्येय्य निश्चित करून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. तरच आजचा राष्ट्रीय खेळाडू उद्या ऑलम्पिक पर्यन्त जावू शकेल. राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांनी जिजामाता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.
आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व शहर पातळी वरील ४४ खेळाडूंना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तर काही क्रीड़ा शिक्षकांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. खेळाडू प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंगपटु तृप्ती निंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले. तर सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी व सुभाष चौधरी यांनी आभार मानले.