पुणे (Pclive7.com):- भारतातील प्रसिध्द ‘ग्रीन हॉटेलियर’ डॉ. विठ्ठल कामत यांचे ‘यश अपयश आणि मी’ या पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी हे पुस्तक त्यांच्या आईला समर्पित केले आहे. परिवार आणि मित्र यांच्या अमूल्य साथीने प्रकाशित झालेल्या या पुस्तकात आई आणि मुलाच्या प्रेमळ नात्यावर भाष्य करण्यात आले.
बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिध्द संचेती इंस्टीट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स अँण्ड रिहँबिलिटेशनचे संस्थापक डॉ.के.एच.संचेती, प्रसिध्द हिंदू विद्वान विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर विठ्ठल कामत यांनी उपस्थितांना पुस्तकामागच्या प्रेरणेविषयी म्हणजेच त्यांच्या आईविषयी सांगितले.
‘यश अपयश आणि मी’ ही कहाणी आहे विठ्ठल कामत यांच्या जीवनातील त्या काळाची जेव्हा त्यांच्या आईला पार्किन्सन, डिमेंशिया आणि अल्झायमर या रोगाचे निदान झाले होते. या काळात विठ्ठल कामत यांनी त्यांच्या आईच्या आरोग्यासाठी मोठा लढा दिला. त्यांनी औषधांशिवाय एका सोप्या पध्दतीचे पालन करत त्यांच्या आईला या रोगांच्या सापळ्यातून सोडवले. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे कौतुक झाले. संपूर्ण पुस्तकात त्यांनी एका गोष्टीवर भर दिला आहे. तसेच आजच्या पिढीला एक मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात ‘पालकांचे’ महत्व. पुस्तकात एका ओळीत त्यांनी म्हटले आहे. “तुम्ही तुमच्या पालकांची काळजी घ्याल तर तुमची मुले त्यांच्या पालकांची काळजी घेतील.”
मुंबईच्या ऑर्किड हॉटेल येथे या पुस्तकाचे यशस्वी प्रकाशन झाल्याच्या केवल दोनच आठवड्यात या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे देखील प्रकाशन होत आहे. विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किट आणि विल पावर’ या पहिल्या पुस्तकाचे त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. हे पुस्तक उद्योजकांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे, आणि त्याचे भाषांतर ९ भाषांमध्ये झाले आहे. तसेच त्यांचे दुसरे पुस्तक ‘उद्योजक होणारच मी’ हे देखील मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झाले आहे.