मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रातील ३६ पैकी १३ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. १३ जिल्ह्यांत एक जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या सरासरी पावसात २० टक्क्यांहून जास्त तूट आली आहे. नगर, सांगली, सातारा, जालना, बीडमध्ये पडणाऱ्या पावसात ४० टक्क्यांहून जास्त तूट निर्माण झाल्यामुळे या जिल्ह्यांमधील रहिवाशांना आणि शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने म्हटलं आहे की, राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतल्या पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून राज्य सरकार १५ जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर आणि १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्कार जाहीर करत आहे.