पिंपरी (Pclive7.com):- कासारसाई धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मुरली कृष्णा बोला (वय २१, रा. कोरेगाव पार्क, पुणे. मूळ रा. आंध्र प्रदेश) आणि कुणाल सर्वेश दुबे (वय २१, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये बी. कॉमचे शिक्षण घेत असलेले चार विद्यार्थी कासारसाई येथील धरणावर आले होते. ते पाण्यात उतरले, मात्र खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. इतर दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. तेथे उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांनी शिरगाव पोलिसांना कळविले.
घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्हींच्या बचाव पथकाने दोघा विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यांना त्वरीत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले,मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.