पिंपरी (Pclive7.com):- आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच आज अजितदादांचा वाढदिवस साजरा होतोयं. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री बनूनच अजितदादांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा करण्यात येईल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा भोसरी येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार रणजित मोहिते पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, युवा नेते रोहित पवार, जिल्हा अध्यक्ष सचिन गुटखुले, माजी आमदार विलास लांडे, बापू पठारे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, पुणे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, जेष्ठ नगरसेवक योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, शाम लांडे, विक्रांत लांडे, नगरसेविका वैशाली घोडेकर, सुलक्षणा शिलवंत, प्रवक्ते फजल शेख, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, उभ्या महाराष्ट्राचा अजितदादांवर विश्वास आहे. जनसामान्यांच्या अडचणींची जाण असणारे त्यांचे नेतृत्व आहे. राज्यात कुठल्याही पक्षाची ताकद त्यांना आता मुख्यमंत्री बनण्यापासून रोखू शकत नाही. १५ ते २० वर्षात एकदा देशात कुठलीतरी हवा येते. २०१४ च्या निवडणूकीत अशीच लाट अाली होती, त्या लाटेने सर्वांनाच उध्वस्त केले. ग्रामपंचायत कार्यालयात कधी गेला नाही तो या लाटेत भाजपाचा खासदार झाला. त्यावेळी तरूणाई मोदींच्या नावाने वेडी झाली होती. ६० वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीने काय केलं असं तरूणाई म्हणतं होती. तोच तरूण ४ वर्षापासून बेरोजगार आहे. आता त्यांची मानसिकता बदलत चाललीय. प्रत्येक खात्यात १५ लाखाचं आश्वासन, वाढती महागाई, तरूणांची बेरोजगारी सर्वच बाबतीत मोदी सरकारनं फसवलं आहे. चार वर्षात काहीच हातात आलं नाही. जनता पूर्णपणे वैतागली आहे, ते दुसरा पर्याय शोधत आहेत. राष्ट्रवादी सक्षम पर्याय म्हणून समोर यायला हवा. हे प्रमुख बुथ प्रमुखांचं काम असणार आहे.
मुख्यमंत्र्यांना मी फडणवीस म्हणतचं नाही, त्यांना मी फसवणीस म्हणतो. कारण जनतेची प्रचंड फसवणूक त्यांनी केलीयं. धादांत्त खोटं बोलतात ते. राज्यात सामाजिक तेढ निर्माण होत आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरण घडलं. औरंगाबादमध्ये दंगल झाली. राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जनता मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वासनांना वैतागली आहे. लोकांची मानसिकता बदलत असून राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. बूथ कमिटी सक्षम करा असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी शेवटी बोलताना दिला.
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन गुटखुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी खासदार रणजित मोहिते पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, माजी आमदार विलास लांडे यांना मनोगत व्यक्त केले. तर शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group