पिंपरी (Pclive7.com):- मॅनेजमेंट, मार्केटिंगच्या काळात शिक्षणाचा व्यापक विचार वाढत जाणे गरजेचे आहे. मनुष्याला कौशल्युक्त शिक्षण आवश्यक असून जडणघडणीतील महत्वपूर्ण टप्पा आहे. परंतु, ते पुरेसे नाही. मनुष्य घडविणारे शिक्षण मनुष्याला सर्वाधिक उपयुक्त बनविते. त्यासाठी आजमितिला मनुष्य घडविणारे शिक्षण देण्याची ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे मत ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे केंद्र प्रमुख वा.ना. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्सच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिकसह विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या गुरुजणांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड, सभाजीनगर येथील नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्सच्या सभागृहात आज (शुक्रवारी) झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, पिंपरी पालिकेच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा व संस्थेच्या संचालिका अनुराधा गोरखे, सचिव डॉ. प्रिया गोरखे, समिर जेऊरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य वैभव फंड, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे उपस्थित होते.
अभ्यंकर म्हणाले, “बुद्धी हे दुधारी शस्त्र आहे. मनुष्याला बुद्धीचा चांगला वापर कसा करावा हे शिकवावे लागते. शिक्षणाचा योग्य पद्धतीने वापर करणे अपेक्षित आहे. स्वत:च्या आणि इतरांचे आरोग्य उत्तम कसे राखावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माणूस बनविण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असून ते आयुष्यासाठी पुरेसे आहे. स्वत:ची ओळख माणूस बनविणारी व्यक्ती अशी झाली पाहिजे”
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “गुणीजनांच्या पाठीशी फारसे कोणी उभा राहत नाही. अमित गोरखे यांनी गुणीजनांचा गौरव करुन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. सत्कार, कौतुक अखंड आकाशाला गवसणी घालण्याचे बळ देते. प्रेरणा दिली जाते आणि प्रेरणा इतिहास घडवते. पदवी मिळूनही बेकार राहणार असाल, तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. जे शिक्षण प्राप्त केले आहे. त्याच्या बळावर उत्तम नोकरी मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभा करणे गरजेचे आहे. विद्वत्तेची, गुणवत्तेची अहवेलना होऊ नये. यासाठी साहसी शिक्षणाची गरज आहे”
प्रास्ताविकात अमित गोरखे म्हणाले, “सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गुरुजनांचा सत्कार करुन प्रेरणा मिळते. त्यांच्या कामातून चांगल्या संस्थाचा गौरव केला जातो. नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्समध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी परदेशात उत्तम करिअर करत आहेत. आजमितीला १७०० हून अधिक विद्यार्थी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्टिट्यूट्समध्ये शिक्षण घेत आहेत. संस्थेने बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमांमध्ये देखील बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक, उपयुक्त असे शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्थांना सद्भावना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय तात्या बापट समितीचे रमेश कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे, अंघोळीची गोळी या संस्थेचे सुर्यकांत मुथियान, स्वामीराज सेवा ट्रस्टचे संजय कणसे, प्रियदर्शनी सोशल ग्रुपचे जवाहरलाल कोठवाणी यांचा ‘सद्भावना’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय आनंदऋषी संस्थेचे अशोक पगारीया, जय हिंद हायस्कुलच्या ज्योतीका मलकाणी, गणेश इंटरनॅशनल स्कूलचे एस.बी.पाटील या गुरुजणांचा देखील गौरव करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी शैलशसिंग रजपूत, मृणाल जोशी, सुसुम गुप्ता, अंजनी रणधीर, राज वैद्य, आरती बहिनवाल, दिव्या वरपे, जया सुर्यवंशी यांच्यासह माजी प्राचार्य डॉ. मृणाली कुलकर्णी, शैलेश लेले यांच्याही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेच्या योगदानात ज्यांनी मोलाची भुमिका बजावली यासर्वांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता गायकवाड यांनी केले. तर, प्राचार्य वैभव फंड यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group