अहमदनगर (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे कुठली गोष्ट करु नका असे त्यांनी राळेगणमध्ये जमलेल्या उपस्थितांना आवाहन केले.
अण्णांच्या आंदोलनामुळे आज नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेवर आहेत. केजरीवालांनी खरंतर आज इथे यायला पाहिजे होतं असे राज म्हणाले. १८ डिसेंबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले होते. लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे. आज पाचवर्ष झाली. लोकपालची नियुक्ती का नाही झाली ? असा सवाल त्यांनी केला. उपोषण करताना जीवावर बेतेल अस करु नका असा सल्ला त्यांनी अण्णांना दिला.
आपण एकत्र येऊ यांना गाडून टाकू असेही राज म्हणाले. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत.
लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त्यांबाबत दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांनी उपोषण स्थगित करावे यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही.
समाजाची सेवा करण्यासाठी तुम्ही मला हा पुरस्कार दिला. मात्र, समाजाची जर दुरावस्था झाली असेल आणि सरकार त्याकडे कानाडोळा करीत असेल तर मला हा पुरस्कार नको. त्यामुळे ८ आणि ९ तारखेला सरकराचा निषेध करण्यासाठी पद्मभूषणही मी राष्ट्रपतींना परत करणार आहे असे अण्णा म्हणाले.