- (गोविंद वाकडे)
(शैक्षणिक धडे गिरवून आप-आपल्या क्षेत्रात निपुण होता येणं सोप्प आहे, मात्र दररोज आयुष्याकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एखादंच पुस्तक, काऊन्सिलिंग, विपश्यना वगैरे करून चालत नाही तर प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्यांकडे बघून आयुष्याचे धडे रोज गिरवावे लागतात…!!!)
तो ऐन तारुण्यात भारतीय लष्करात भरती होतो, ट्रेंनिग नंतरच्या काही दिवसातच अनेक खेळात प्राविण्य मिळवल्याने कीर्ती,मान मर्तब पैशासह यश त्याच्या पायावर लोळण घालत असल्याने त्यांच्या आनंदाला पारवार उरत नाही मात्र….अचानक 1965 च्या #भारत_पाक युद्धाची घोषणा होते त्यात त्याला सहभागी व्हावं लागतं,अनेक शत्रूंना तो धारातीर्थी पाडतो मात्र शत्रूंनी पाठीवर केलेल्या हल्ल्यात तो जखमी होतो, त्याला अनेक गोळ्या लागतात, शत्रू त्याला आपल्या गाडीखाली चेंदवतात आणि त्याचा निपचित पडलेला देह बघून शत्रू निघून जातात, लष्कारातील सहकारी मात्र तातडीने उपचार करून त्याला वाचवतात मात्र जखमा खोल असल्याने त्याला स्मृतिभंश होतो, तो कमरेखालच्या भागात अपंगत्व येतं आणि एक गोळी (आजही) त्याच्या मणक्यात रुतून बसते…
होय मी अपंगांच्या पॅराऑलम्पिक स्पर्धेत देशाला पाहिलं सुवर्णपदक मिळवून देणारे पिंपरी चिंचवडचे पद्मश्री श्री मुरलीकांत पेटकर ह्यांचा बद्दल बोलतोय.सुमारे दीड वर्षाच्या उपचारा नंतर जेव्हा ते शुद्धीत आले तेव्हा त्यांची स्वतःला बघून झालेल्या अवस्थेचा विचारही करवत नाही, अपंग होण्यापेक्षा “त्या” युद्धात शहीद का झालो नसेल या विचाराने त्यांचं मन कुरतडायला सुरवता केली होती.मात्र त्यांनी स्वतःला सावरलं, उभं केलं, शारीरिक व्यायाम म्हणून रोज पोहायला लागले आणि पोहता पोहता त्यांनी नकळत पार केला अपयशाचा समुद्र त्यांची झेप एव्हढी मोठी होती की त्यांनी थेट भारतातील सर्वोच्च सन्मानापैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराला गवसणी घातली.
पेटकरांचा हा प्रवास मी अगदी थोडक्यात मांडलाय.मात्र #COURAGE_BEOYND_COMPARE” या पुस्तकात मांडलेल्या पेटकरांच्या पूर्ण जीवन प्रवास वाचून सुशांतसिंग एव्हढा भारावला होता की त्याने त्यांच्या जीवनपट मोठ्या पडद्यावर मांडण्याचं ठरवलं, तारुण्यातील मुरलीकांत, युद्धातील जिगरबाज सैनिक, अपंग असतांना अपयशाचा समुद्र पार करणारा खेळाडू आणि पद्मश्री पुरस्काराचा मानकरी हा प्रवास त्याला स्वतः मुरलीकांत बनवून रुपेरी पडद्यावर आणायचा होता त्यासाठी त्याने पेटकरांच्या पिंपरी चिंचवडमधील राहत्या घरी येऊन अनेक वेळा भेट घेतली आणि त्यांच्याकडून प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्याचा धडा तो शिकत होता.
मात्र नियतीला हे मान्य नसावं, मुरलीकांतजीवर चित्रपट काढण्याच्या प्रोजेक्ट लांबणीवर पडला, दोघांच्या भेटी गाठी कमी झाल्या, सुशांत आपल्या इतर चित्रपटांमध्ये मग्न झाला ह्याच काळात त्याचा #छिछोरे आला या चित्रपटाने अनेकांच्या जगण्याची उमेद वाढविली मात्र हा चित्रपटही सुशांतच्या जीवनातील कोंडी, घुसमट फोडू शकला नाही कारणं छिछोरे चित्रपट हा शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या नैराश्यामुळे जीवन संपविण्यासाठी निघालेल्यांसाठी धडा देणारा होता खरंतर त्यातून सुशांतलाही शिकता आलं असतं मात्र तसं झालं नाही
सुशांतच्या आत्महत्येची बातमी दुपारी आली तेव्हा मुरलीकांतजी विश्राम करत होते, झोपेतून उठल्या नंतर त्यांना त्यांच्या मुलगा अर्जुनने जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा पहाडा सारखे मुरलीकांत मनाने कोसळले, स्तब्ध झाले आणि एक शब्दही न बोलता खिडकीत जाऊन ज्या वाटेने सुशांत त्यांच्या घरी यायचा त्या वाटेकडे खिन्न नजरेने बघत उभे राहिले, काही भेटीतीच मुरलीकांत स्वतःला सुशांतमध्ये बघायला लागले होते त्यांचं अस्तित्व सुशांतच्या रूपाने जगासमोर येणार होतं आता मात्र तसं होणार नाहीय ..!!
सुशांतने आत्महत्या का केली हा प्रश्न आता कॉमन झालाय त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित मिळेलही पण अशा माणसाच्या जाण्याने सामान्य माणसांच्या मनात जी पोकळी निर्माण झाली किंवा जे तरुण-तरुणी सुशांतला आपला #आयडॉल मानू लागले त्यांच्या मनावर होणारा परिणाम कधीही न भरून निघणारा आहे..त्यामुळे सुशांत सिंह सारख्या हरहुन्नरी कलाकाराला चित्रपटातील हिरो म्हणून स्वीकारायला हरकत नाही मात्र केवळ जिद्दीच्या बळावर जीवन जगणारे खरे हिरो आणि अवलिये कलाकार मुरलीकांतजीं सारखेच माणसं असतात हे समजून घ्या…आणि म्हणूनच वाटतं की कदाचीत सुशांत मुरलीकांत झाला असता तर वाचला असता.
अलविदा सुशांत……!!!
- गोविंद वाकडे























Join Our Whatsapp Group