पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत असल्याने काँग्रेसचे नाराज शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे मागे घेतले आहेत. त्यामुळे शहर काँग्रेसने उपासले राजीनामाअस्त्र म्यान केले आहे. आता पुन्हा हे सर्व पदाधिकारी नव्या उत्साहाने पक्ष कार्यालयास सुरुवात करणार आहेत.
पक्ष निरिक्षक मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले असल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिन साठे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष गौतम आरकडे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयुर जयस्वाल, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी विभागाचे किशोर कळसरकर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णू नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रूपनर, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, एनएसयुआयचे अध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की आदी उपस्थित होते.
शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत असल्याने नाराज झालेल्या सचिन साठे यांनी ८ जुलै रोजी पक्ष निरिक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तडकाफडकी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेत सकारात्मक चर्चा झाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन या चर्चेत देण्यात आले आहे. त्यामुळे एकजुटीने काम करण्यासाठी हे पदाधिकारी पुन्हा सज्ज झाले आहेत. गेली २०-२५ वर्षांपासून पक्ष कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ पातळीवर झालेल्या सकारात्मक चर्चेने या सर्व पदाधिकारी पुन्हा पक्ष कार्याला सुरुवात करणार आहेत.
पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामे मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले असल्याचे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी सांगितले.