अहमदनगर (Pclive7.com):- २०१९ साली परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादीचे सरकार येईल आणि अजितदादा पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घटनावेळी बोलत होते.
२०१९ साली राष्ट्रवादीचे सरकार येऊन, अजित पवार प्रमुख असतील, असा दावा करुन धनंजय मुंडेंनी नव्या चर्चांना सुरुवात करुन दिली आहे. अजित पवार प्रमुख असतील म्हणजेच अजित पवार हे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का, असे प्रश्न उपस्थित करुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत, काळा पैसा, स्वच्छता अभियान, महागाईवर सरकारला धारेवर धरले.
मुख्यमंत्र्यांवरही धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली. “भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक सरकार म्हणत आहेत. मात्र फडणवीस यांनी २०१४ साली आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र सत्तेत तीन वर्षे असून आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत. फक्त चर्चा करुन वातावरण तापवले. मात्र तीन वर्षात फडणवीस सरकारच्या ११ मंत्र्यांचे पुरावे दिले, मात्र फडणवीसांनी त्यांना क्लीन चीट दिली.”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ‘अच्छे दिन’चं हाडूक गळ्यात अडकल्याचे म्हटले. विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाखांचं अश्वासन दिले. मात्र जनता अजूनही पैशाची वाट पहात असल्याचे मुंडे यांनी म्हणाले.
विरोधात असताना भाजपवाले महागाईच्या गप्पा मारत होते. पेट्रोल ५५ वरुन ८० वर गेल आहे. गॅस, डाळीचे भाव गगनाला भिडलेत. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मधून दर कमी होईल हे सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
धान्य महाग झाल्यावर पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ६ कोटी शौचालयांचे अश्वासन दिले. मात्र खायला अन्न नसून जनता उपाशी मरत आहे. खाये इंडिया तो ही जाये इंडिया, असं म्हणत खायलाच अन्न नसताना शौचालयाचं स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केला.